पुणे : ‘विद्यार्थीदशेतच समाजसेवेची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य केले, तर आपल्या आर्थिक उन्नतीसह मानसिक समाधानही मिळते. गुणवत्तेबरोबरच ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करुन सामाजिक भावना विकसित केली पाहिजे. कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तील परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
‘केजे शिक्षण संस्थे’च्या केजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग व ट्रिनिटी अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग या महाविद्यालयांच्या पदवीप्रदान सोहळ्यात डॉ. चव्हाण बोलत होते.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव के. बी. खिलारी, संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, केजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर, ट्रिनिटी अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. विजय वाढई यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण जाधव म्हणाले, ‘आयुष्यात यशस्वी वाटचाल करण्यासाठी शिस्त, मेहनत व उत्तम दर्जा या तीन गोष्टी आत्मसात कराव्यात. अभियांत्रिकी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकून घेतली, तर या संधींचा फायदा घेणाऱ्या अभियंत्यांना उज्ज्वल भविष्य आहे. नोकरीबरोबरच स्वत:चा व्यवसाय उभारण्याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.’
प्राचार्य डॉ. सुहास खोत प्रास्ताविकात म्हणाले, ‘केजे महाविद्यालयाच्या प्रिया अहिरवार व प्रकाश गावडे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. पुढील वर्षीही केजे महाविद्यालयाचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत प्रथम येईल व महाविद्यालय हॅट्रिक साधेल.’
डॉ. प्रकाश डबीर यांनी आभार मानले.